बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली   

कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांचे प्रतिपादन 

पुणे : सध्याच्या बालसाहित्यातून वास्तवता मांडली जात असली तरी त्यातून रम्यता व कल्पकता हरवत चालली जात आहे. मात्र, ज्योती उटगीकर-देशपांडे लिखित ‘आधुनिक जंगल’ या बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी केले.उत्कर्ष प्रकाशनतर्फे ‘आधुनिक जंगल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लोकमान्य नगरमधील रुईया मूकबधीर विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जोशी बोलत होत्या. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, स्नेह सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर, प्रकाशक सु. वा. जोशी, प्राचार्य श्याम भुर्के, एकपात्री कलाकार बंडा जोशी मंचावर होते. कविता वाचनातून मुलांवर शब्दसंस्कार होतात, असे सांगून मृणालिनी कानिटकर-जोशी म्हणाल्या, बालवयात मुलांना चांगले, सकस साहित्य वाचायला मिळाल्यास मुलांची जडणघडण चांगल्या माणसात होईल.
 
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ‘आधुनिक जंगल’ या बालकविता संग्रहातून जुन्याचे आधुनिकतेशी संधान साधले गेले आहे. लहान मुलांसाठी साहित्यनिर्मिती करणे ही फार अवघड गोष्ट असते. मुलांच्या अंतरंगात शिरून व्यक्त व्हावे लागते.  बालसुलभ कुतुहलता, जिज्ञासा असावी लागते. ज्योती उटगीकर-देशपांडे यांनी तन्मयतेतून लिखाण केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काव्यामुळेच मिळाला असल्याचे सांगून श्याम भुर्के म्हणाले, ज्योती उटगीकर-देशपांडे यांच्या कविता अंतर्मुख करायला लावणार्‍या आहेत. 
 
बंडा जोशी म्हणाले, मराठी वाचनासाठी मुलांना उद्युक्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे शाळांमध्ये बालकवितांच्या वाचनाचे कार्यक्रम व्हायला हवेत. सु. वा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. अंजली अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.
 

Related Articles